आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील असामान्य कलाकार बालगंधर्व – नारायण श्रीपाद राजहंस (१८८८-१९६७) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Balgandharva Narayan Shripad Rajhans यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बाल गंधर्व म्हणून प्रसिद्ध असलेले नारायण श्रीपाद राजहंस हे एक प्रसिद्ध मराठी गायक आणि रंगमंच अभिनेता होते. त्यांच्या काळात महिलांना रंगमंचावर काम करण्याची परवानगी नसल्यामुळे ते मराठी नाटकांतील स्त्री पात्रांच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. बाल गंधर्व हे नाव पुण्यातील गायनाच्या कार्यक्रमामुळे मिळाले. लोकमान्य टिळक, एक समाजसुधारक आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे स्वातंत्र्यसैनिक प्रेक्षकांमध्ये होते, आणि कामगिरीनंतर त्यांनी राजहंसच्या पाठीवर थाप मारली आणि नारायण हे “बाल गंधर्व” असल्याचे सांगितले.
बालगंधर्व – नारायण श्रीपाद राजहंस
बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक-अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या गायनाने आणि अभिनयाने मराठी नाटक जगप्रसिद्ध करणारे ते एक असामान्य कलाकार होते. बालगंधर्वांचे पूर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीपाद कृष्णाजी राजहंस आणि आईचे नाव अन्नपूर्णाबाई होते. बाल गंधर्वांचा जन्म २६ जून १८८८ रोजी पुण्यात झाला. सांगली जिल्ह्यातील नागठाणे हे त्यांचे मूळ गाव.
मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश करावा लागेल. १९०५ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीच्या ‘शाकुंतल’ नाटकातून त्यांनी नाट्यविश्वात प्रवेश केला. तेव्हापासून ते १९५५ पर्यंत त्यांनी रंगभूमीवर विविध स्त्री-पुरुष भूमिका करून मराठी नाटकाच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावली. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृद्ध करण्यात बाल गंधर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बालगंधर्वांची ‘ शाकुंतल ‘ नाटकातील शकुंतलेची पहिलीच भूमिका अतिशय गाजली. पुढे सन १९११ मध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ‘ मानापमान ‘ हे नाटक रंगभूमीवर आले. त्यातील त्यांच्या भामिनीच्या भूमिकेने तर महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले . त्या वेळेपासून त्यांचे नाव सर्व महाराष्ट्रभर झाले आणि ते नाट्यप्रेमी मराठी जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. मराठी जनतेने बालगंधर्वांवर प्रेमाचा अक्षरशः वर्षावच केला. असे प्रेम अन्य कोणत्या कलावंताच्या वाट्याला क्वचितच आले असेल.
Balgandharva – Narayan Shripad Rajhans Information in Marathi
शकुंतला व भामिनी यांशिवाय इतरही स्त्री भूमिका बालगंधर्वांनी साकार केल्या होत्या. ‘ एकच प्याला ‘ नाटकातील सिंधू , ‘ संशयकल्लोळ ‘ मधील रेवती, ‘ सौभद्र’मधील सुभद्रा, ‘ मृच्छकटिक ‘ मधील वसंतसेना, ‘ विद्याहरण ‘ मधील देवयानी, ‘ स्वयंवर ‘ मधील रुक्मिणी, ‘ शारदा ‘ नाटकातील शारदा या त्यांच्या भूमिका केवळ अजरामर झाल्या आहेत. बालगंधर्वांची स्त्री भूमिका म्हणजे साक्षात् कायाप्रवेश. त्यांच्या मुद्रेत, नजरेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, बोलण्यात, कपडे नेसण्यात साक्षात् स्त्रीचा संचार झालेला असे.
“ पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल, ” असे आचार्य अत्रे यांनी त्यांच्यासंबंधी म्हटले आहे. बालगंध स्त्री – भूमिकांबरोबरच काही पुरुष- भूमिकाही केल्या आहेत ; पण नाट्यरसिकांना त्यांच्या स्त्री – भूमिकाच अधिक भावल्या होत्या. अतिशय मोहक व भावस्पर्शी चेहरा आणि गंधर्वतुल्य आवाज ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये सांगितली जातात. आपल्या सुमधुर आवाजाने त्यांनी ‘ बालगंधर्व ‘ हे संबोधन अगदी सार्थ करून दाखविले.
बालगंधर्वांची गायनातील मधुरता व अभिनयातील सहजता केवळ असामान्य होती. ‘ भूमिकेशी तद्रुपता ‘ हा त्यांच्या अभिनयाचा गुणविशेष मामला जातो . त्यांनी रंगभूमीवरील आपल्या संपूर्ण कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका केल्या होत्या, परंतु यांतील प्रत्येक भूमिका त्यांनी सारख्याच तन्मयतेने आणि समरसतेने साकार केली होती. ‘ मला मदन भासे ‘ , ‘ खरा तो प्रेमा ‘ , ‘ नाही मी बोलत आता ‘ , ‘ नाथ हा माझा ‘ , ‘ मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला ‘ , ‘ मना तळमळशी ‘ , ‘ सुजन कसा मन चोरी ‘ , ‘ स्वकुल तारक सुता ‘ , ‘ संशय का मनी आला ‘ , ‘ वद जाऊ कुणाला शरण ‘ , ‘ सत्य वदे वचनाला नाथा ‘ , ‘ कशी या त्यजू पदाला ‘ , ‘ मम मनी कृष्णसखा रमला ‘ , ‘ नरवर कृष्णासमान यांसारखी बालगंधर्वांनी रंगभूमीवर गायलेली पदे म्हणजे श्रोत्यांच्या दृष्टीने अपूर्व असा अमृतानुभव होता . त्यांच्या मधुर स्मृती आजही अनेक वृद्धांच्या मनी रेंगाळत आहेत.
मराठी रंगभूमीने बालगंधर्वांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली असली तरी बालगंधर्वांनीही आपल्या परीने रंगभूमीची सेवा करून त्याची पुरेपूर भरपाई केली होती. प्रेक्षकांना पुरेपूर समाधान मिळवून देण्यासाठी नाटकावर कितीही पैसा खर्च करावा लागला तरी बालगंधर्वांनी कधी मागेपुढे पाहिले नाही किंवा आपला हात आखडता घेतला नाही. त्यासाठी त्यांना अखेरीस कर्जबाजारी व्हावे लागले तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. १८ जुलै, १९१३ रोजी बालगंधर्वांनी ‘ किर्लोस्कर नाटक मंडळी ‘ सोडली.
तत्पूर्वी त्यांनी दि. ५ जुलै, १९१३ रोजी स्वतःची वेगळी ‘ गंधर्व नाटक मंडळी ‘ स्थापन केली. या कंपनीमार्फतही त्यांनी अनेक नाटके रंगभूमीवर आणली. त्यांची मराठी रंगभूमीवर असीम निष्ठा होती. पुढे सन १९३५ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला . चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी १८ एप्रिल, १९३४ अखेरीस ‘ गंधर्व नाटक मंडळी’चे विसर्जन केले. ‘ धर्मात्मा ‘ चित्रपटातील त्यांची एकनाथाची भूमिका विशेष गाजली होती; परंतु नाट्यसृष्टीइतके यश त्यांना चित्रपटसृष्टीत मिळाले नाही.
डिसेंबर १८९८ मध्ये लोकमान्य टिळकांसमोर नारायणरावांनी गायलेल्या गाण्याने खूश झालेल्या लोकमान्यांनी त्यांचे चुलते यशवंत कुलकर्णी यांना उद्देशून म्हटले, ‘ अरे हा तुझा नारायण एक बालगंधर्वच आहे बुवा ‘असे शब्द बाहेर आले. केसरीमध्येही ‘नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व’ या गायनाच्या कार्यक्रमाची बातमी लगेच प्रसिद्ध झाली. तेव्हापासून ते ‘बालगंधर्व’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
21 जानेवारी 1929 रोजी पुण्यात झालेल्या 24 व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1944 मध्ये मुंबईत झालेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. मार्च 1955 मध्ये त्यांना अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपती पदक देण्यात आले. भारत सरकारने 1964 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. अश्या असामान्य बालगंधर्व उर्फ नारायण श्रीपाद राजहंस यांचा 15 जुलै 1967 रोजी पुण्यात मृत्यू झाला.
हे सुद्धा वाचा –