आपण या आर्टिकल मध्ये भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९०९ – १९९४) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Tarkatirtha Laxmanshastri Joshi यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे थोर विचारवंत, संस्कृत पंडित आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून आपणास ज्ञात आहेत. पुरोगामी विचारांचा प्रकांड पंडित, सृजनशील साहित्यिक आणि चिकित्सक तत्त्वज्ञ अशी सर्वकक्षी प्रतिमा असलेल्या शास्त्रीजींचा वैचारिक महाराष्ट्रावर एक विशेष असा ठसा उमटलेला आहे.
तर्कतीर्थांचे संपूर्ण नाव लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी असे होते. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्याती पिंपळनेर या गावी २७ जानेवारी, १९०१ रोजी झाला. त्यांना संस्कृत व वेदाचे प्राथमिक धडे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. शास्त्रीजी वयाच्या तेराव्या – चौदाव्या वर्षी स्वामी केवलानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली व्याकरण, न्याय, पूर्वमीमांसा, वेदान्तादी शास्त्रांचे अध्ययन केले. त्यानंतर पुढील अध्ययनासाठी ते वाराणसीला गेले.
सन १९२३ मध्ये त्यांनी कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘ तर्कतीर्थ ‘ ही पदवी संपादन केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातही भाग घेतला होता. सन १९३०-३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते सहभागी झाले होते. त्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली होती.
Laxmanshastri Joshi यांचे कार्य
पुढील काळात लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडला. सन १९३६ मध्ये रॉय यांनी स्थापन केलेल्या ‘ रॅडिकल डेमोक्रॅटिक ‘ पक्षाचे ते क्रियाशील सदस्य बनले. महाराष्ट्रातील प्रमुख रॉयवादी नेत्यांपैकी ते एक होते. महाराष्ट्रात रॉयवादी विचारप्रणालीचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. रॉय यांनी आपला हा पक्ष विसर्जित करेपर्यंत शास्त्रीजी त्या पक्षात राहिले होते. त्यानंतरही त्यांच्यावरील रॉयवादाचा प्रभाव कायम राहिला होता.
तर्कतीर्थ जोशी हे धर्मशास्त्राचे अभ्यासक असले तरी त्यांनी सतत पुरोगामी किंवा प्रागतिक विचारांचाच पाठपुरावा केला होता. धर्मशास्त्राच्या अभ्यासाने त्यांना प्रतिगामी बनविले नाही. उलट, या अभ्यासाचा उपयोग त्यांनी परिवर्तनवादी शक्तींना पाठबळ मिळवून देण्यासाठीच केला. अनेक सामाजिक व धार्मिक सुधारणांना धर्मशास्त्रांचा आधार असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
त्यासाठी त्यांनी शंकराचार्य व इतर सनातनी मंडळींचा रोषही ओढवून घेतला. साहजिकच, महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीत शास्त्रीजींना महत्त्वपूर्ण स्थान लाभले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाशीही त्यांचा निकटचा संबंध प्रस्थापित झाला होता. लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ज्ञानाच्या क्षेत्रातील कार्य तर अतिशय मौलिक असे आहे. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतर्फे धर्मकोशाच्या संपादनाचे कार्य हाती घेण्यात आले होते. या धर्मकोशाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या कार्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. मराठी विश्वकोशाचे एकूण चौदा खंड त्यां संपादकत्वाखाली तयार झाले. त्यातील प्रत्येक खंड सुमारे एक हजार पृष्ठांचा आहे. यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट व्हावी. ‘ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका’शी तुलना केली जाऊ शकेल असेच या विश्वकोशाचे स्वरूप आहे.
पद्मभूषण पदवी’ने सन्मानित
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या ‘ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष म्हणून शास्त्रीजींची नियुक्ती झाली होती. या पदावर त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. सन १९५४ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. सन १९७३ मध्ये राष्ट्रपतींनी ‘ राष्ट्रीय संस्कृत पंडित ‘ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘ एल्एल्. डी. ‘ ही पदवी बहाल केली होती. भारत सरकारने त्यांना ‘ पद्मभूषण ‘ हा किताब दिला होता. त्यांच्या ‘ वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथाला ‘ साहित्य अकादमी’चा पुरस्कार लाभला होता. मृत्यू २७ मे, १९९४ रोजी महाबळेश्वर येथे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे पुस्तक व ग्रंथ
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे ग्रंथ असे आहेत- शुद्धिसर्वस्वम् , आनंदमीमांसा , हिंदू धर्माची समीक्षा, जडवाद, ज्योतिर्निबंध, वैदिक संस्कृतीचा विकास, शिखांचा पंथ व इतिहास, आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त इत्यादी.
हे सुद्धा वाचा –