Vibhakti in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये “विभक्ती प्रत्यय” हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात विभक्ती म्हणजे काय आणि विभक्तीचे किती प्रकार आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो व वचनभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. त्याचप्रमाणे विभक्तीमुळेही नामाच्या रूपात बदल होतो; त्याचा आपण अभ्यास करु.
विभक्ती म्हणजे काय
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती‘ असे म्हणतात.
प्रत्येक वाक्य हे एखादया कुटुंबासारखे आहे. कुटुंबात आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी अशा विविध नात्यांची काही माणसे एकत्र येतात. कुटुंबात एक व्यक्ती प्रमुख असते. या प्रमुख व्यक्तीशी त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष असे नाते असते. हीच गोष्ट वाक्यातही पाहावयास मिळते. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात. वाक्यात जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो.
उदाहरणार्थ. ‘शेजारी, मधू, रस्ता, कुत्रा, काठी, मार‘ असे शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही. या शब्दसमूहाला वाक्य म्हणता येत नाही. ते वाक्य होण्यासाठी ‘ शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले‘. अशा स्वरूपात शब्दरचना करायला हवी. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात ‘विभक्ती‘ असे म्हणतात.
प्रत्यय आणि सामान्यरूप
नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यांस ‘प्रत्यय‘ असे म्हणतात. वरील वाक्यात ‘च्या, ने, त, ला‘ हे विभक्तीचे प्रत्यय होत. हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला ‘सामान्यरूप‘ असे म्हणतात. ‘रस्त्या‘ व ‘कुत्र्या‘ ही रस्ता व कुत्रा या नामांची सामान्य रूपे होत व ‘रस्त्यात‘, ‘कुत्र्याला‘ ही विभक्तीची रूपे होत. पुढील तक्त्यात मूळ शब्दात कसा बदल होतो , तसेच सामान्यरूप व विभक्तीचे प्रत्यय दिसून येतील.
विभक्तीचे प्रकार
प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते. यात क्रियापद हा प्रमुख शब्द होय. ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला ‘ कर्ता ‘ असे म्हणतात. ही क्रिया कोणावर घडली? कोणी केली? कशाने केली? कोणासाठी केली? कोठून घडली? कोठे किंवा केव्हा घडली? हे सांगणारे शब्द वाक्यात असतात. नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा आठ प्रकारचा असतो; म्हणून विभक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात. ते असे,
- प्रथमा
- द्वितीया
- तृतीया
- चतुर्थी
- पंचमी
- षष्ठी
- सप्तमी
- संबोधन
यांतील पहिल्या सातांना संस्कृतातील नावे दिली आहेत. आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून त्याला ‘अष्टमी‘ असे न म्हणता ‘संबोधन‘ असे नाव दिले आहे . (संबोधन = हाक मारणे , बोलावणे)
विभक्ती प्रत्यय
या विभक्ती चे प्रत्यय कोणते व त्यामुळे नामाच्या स्वरूपात काय बदल होतात, हे पुढील तक्त्यावरुण दिसून येईल.
विभक्तीचे प्रकार | एकवचन प्रत्यय | एकवचन शब्दाची रुपे | अनेकवचन प्रत्यय | अनेकवचन शब्दाची रुपे |
प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन | —- स, ला, ते ने, ए, शी स, ला, ते ऊन, हून चा, ची, चे त, ई, आ —- | फूल फुलास, फुलाला फुलाने, फुलाशी फुलास, फुलाला फुलाहून फुलाचा फुलात फुला | —- स, ला, ना, ते नी, शी, ई, ही स, ला, ना, ते ऊन, हून चा, ची, चे त, ई, आ —- | फुले फुलास, फुलांना फुलांनी, फुलांशी फुलांस, फुलांना फुलांहून फुलाचा-ची-चे फुलांत फुलांनो |
- यातील काही प्रत्ययाचा उपयोग केवळ पद्यात होतो.
- वरीलपैकी सर्व नामानांही प्रत्यय लाऊन रुपे तयार करता येतात.
- नामांची किंवा सर्वनामांची विभक्ती प्रत्ययावरून ओळखतात.
हे सुद्धा वाचा –